रत्नागिरी | पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खुन्याला फाशी किंवा जन्मठेप झालीच पाहिजे.. वारिशेच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे …रिफायनरी हटवा ..कोकण वाचवा अशा घोषणांनी राजापूर दणाणून गेले. वारिशेंच्या अपघातानंतर संतप्त झालेल्या रिफायनरी विरोधी जनतेने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
राजापूर शहरातील गणेश विसर्जन घाटापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये खासदार विनायक राऊत, कोकण रिफायनरी विरोधी समितीचे अध्यक्ष अशोक वालम, रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चात रिफायनरी विरोधी घोषणा देण्यात आल्या. कोकणची भूमी वाचविण्यासाठी रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे यासह दिवंगत पत्रकार शशिकांत वारिशे याच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, शासनाने या प्रकरणाचा कसून तपास करावा अशीही मागणी केली.