प्रियसीचे लग्न ठरल्याने एकाच दोरीला गळफास लावून प्रेमीयुगुलाची आत्महत्या.
🔸अशोक काळकुटे | संपादक
▪️परमेश्वर सावंत | हिंगोली.
कळमनुरी तालुक्यात एक हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. जवळा पांचाळ येथील शेतात प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मुलीचे लग्न इतरत्र ठरल्याने दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात होत आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, जवळा पांचाळ परिसरात गुंडलवाडी येथील युवक व युवतीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. अजय केशव डुकरे (१८, रा.गुंडलवाडी) आणि सरस्वती देविदास कऱ्हाळे (१५, रा.राजदरी ता.औंढा, ह. मु. गुंडलवाडी ता. कळमनुरी) या दोघांनीही जवळा पांचाळ शिवारातील आंब्याच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
अजय हा परभणी येथे बारावीत शिकत होता. कॉलेज बंद असल्याने तो काही दिवसांपासून गावातच होता. तर सरस्वती हिचे वडील गावात सालगडी म्हणून काम करतात. तिचा नुकताच विवाह ठरला होता. ते त्यांच्या मुळ गावी लग्नाच्या तयारीत होते. त्यातच ही घटना घडली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मात्र, परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. हे युवक व युवती प्रेमीयुगल असल्याची चर्चा सोशल मीडियावर तसेच परिसरात सुरू आहे. दोन्ही युवक व युवती एकाच वेळी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.