हिंगोली आगाराला जवळपास एक कोटीचा फटका; १५ दिवसांपासून लालपरी जागेवरच.
🔸अशोक काळकुटे | संपादक
▪️परमेश्वर सावंत | हिंगोली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी एक ते १५ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तर १५ एप्रिलपासून आगारातील एकही बस धावली नसल्याने आगाराला जवळपास एक कोटीचा फटका बसला.जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने सुरुवातीला जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागू केली होती. तरी देखील रुग्ण संख्या झपाट्याने वाढतच होती. अखेर जिल्हाधिकारी यांनी सात दिवसाच्या संचारबंदीचे आदेश लागू केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय संपूर्णपणे बंद असल्याने शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत असून रस्ते ही ओस पडले आहेत. मात्र ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला असून विनाकारण मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. आग्रह जिल्ह्यात १५ दिवसापासून कडक संचारबंदी लागू असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कडक उपाय योजना राबवित आहे. त्यानुसार रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून चोप दिला जात आहे. तर वाहतूक पोलिस व पालिका कर्मचाऱ्यांकडून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन दंड वसूल केला जात आहे.तसेच हिंगोली आगारातील सर्व बससेवा ठेखील ठप्प पडल्याने मागील पंधरा दिवसापासून एकही बस आगाराच्या बाहेर निघाली नसल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. आगारातील ५२ बस गाड्यांची चाके रुतल्याने प्रतिदिन पाच लाख या प्रमाणे एक कोटीचे उत्पन्न बुडाले असल्याने आगाराचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत वीस हजार किलोमीटरचा प्रवास संचारबंदीमुळे थांबला आहे. बसेस बंद असल्याने चालक वाहकही निवांत आहेत. उत्पन्नावर आधारित गाड्यांच्या फेऱ्या ठरविल्या जातात असे आगारप्रमुख प्रेमचंद चौतमल यांनी सांगितले. आता टाळेबंदी उठल्यानंतरच बाहेर जिल्ह्यात बसेस सोडण्याचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.