तोक्ते चक्रीवादळात कोकणातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होत. त्यासाठी केंद्रीय पथकही राज्यात दाखल झालं असून, पालघर जिल्ह्यातून पाहणी केल्यानंतर आता ते पथक रायगडमध्ये पोहोचलं आहे. त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचाही ते दौरा करणार आहेत. त्याच दौऱ्यावरून आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी केलीय. तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकण किनारपट्टीच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथक दौऱ्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
‘सवतीचं पोर’ या भावनेतून केंद्र सरकार महाराष्ट्राकडे पाहत असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय. केंद्र सरकार महाराष्ट्राकडे अत्यंत कलूषित नजरेने पाहात असून, निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेलासुद्धा केंद्रीय पथक उशिरा आलं आणि आताही हे पथक उशिराने येत आहे, या पथकाला झालेलं नुकसान तेव्हाही दिसलं नाही आणि आताही दिसणार नाही. बैल गेला आणि झोपा केल्यासारखाच हा पाहणी दौरा असल्याची जहरी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.