सांगली | राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातली लढाई आता जोरदार होताना दिसत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शत प्रती शत ओबीसी उमेदवार देण्याचीच फडणवीसांनी काल घोषणा केलीय, त्यावर सत्ताधारी चेकमेट झाल्याचं चित्रं आहे. त्यातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी मंत्र्यांवर एकदम जळजळीत टिका केलीय.
पडळकर हे सांगलीतल्या झरेमध्ये बोलत होते. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवर यांच्यावर त्यांनी जोरदार टिका केली होती. पडळकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेत्यांचं काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर झालंय. आणि ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय.जिथं ओबीसी मंत्र्यांच्याही शब्दाला मातीची किंमत नाहीये, तिथं सर्वसामान्य ओबीसींविषयी या प्रस्थापितांना किती आकस असेल.
एकीकडे ओबीसी मंत्री म्हणतात “जो पर्यंत ओबीसी आरक्षण पुन्हा प्रस्थापित होणार नाही, तो पर्यंत आम्ही निवडणूक होऊ देणार नाही” पण दुसऱ्याच दिवशी निवडणूका जाहीर होतात. काय किंमत झालीये ओबीसी मंत्र्यांची? तुम्ही काय फक्त प्रस्थापितांना मुजरे घालण्यासाठी मंत्री झालात का? तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का? आता बास झालं. ओबीसी भटके विमुक्त बहुजन समाजाचा विश्वास घात करून निवडणूका घ्याल तर ओबीसी समाज दणका दिल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी टीका पडळकर यांनी केली आहे.