मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमात बोलताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढताना भावुक झाले होते. राणेंनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांसमोर सिंधुदुर्गाच्या कामाचं श्रेय आपलंच असल्याचं सांगितलं. उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केला, असं नारायण राणे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे आज मोठ्या थाटात लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील प्रभू, नितेश राणे व इतर मंत्री उपस्थित होते. तर, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खासदार विनायक राऊत यांनी केलं. यावेळी नारायण राणे बोलत होते.
राणे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा चांगला क्षण आहे. अशा ठिकाणी राजकारण करू नये असं वाटत होतं. जावं, शुभेच्छा द्याव्या आणि सिंधुदुर्गातून विमान उडताना डोळेभरून पाहावं असं वाटलं. त्यासाठी आलो. मंचावर आल्यावर मुख्यमंत्री भेटले. ते माझ्या कानावर काही तरी बोलले. मी एक शब्द ऐकला. असो, असं राणे म्हणाले.