ना. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये होणार ओबीसी, व्हीजेएनटी समाजाचा एल्गार!
राज्यव्यापी अधिवेशनास ओबीसी, बाराबलुतेदार, आठरा आलुतेदार, एसबीसी, भटके विमुक्त समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – अर्जुन दळे
बीड / प्रतिनिधी;- महाराष्ट्र राज्यातील बाराबलूतेदारांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक समस्यांवर उपाययोजना संधर्भात विचार विनिमय व धोरण ठरविण्यासाठी राज्यव्यापी पाहिले अधिवेशन मुंबई बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात दि. २ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता होणार असून या अधिवेशनास बीड जिल्ह्यातील ओबीसी बाराबलुतेदार, आठरा आलुतेदार, एस.बी.सी., भटके विमुक्त समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे यांनी केले आहे.
अधिवेशनास राज्याचे ओबीसी कल्याण व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते बारा बलुतेदार, अलूतेदार, एसबिसी, मायक्रो ओबीसिंच्या अन्यायग्रस्त जातींच्या संविधानिक न्याय हक्कांसाठी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती अर्जुन दळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत तरी ग्रामीण मजुरी, कौटुंबिक सेवा पुरविणारा, शेती औजारे, कला कौशल्यांची कामे, निवारा, उद्योग क्षेत्रात मिनी इंडस्ट्रीचा पाया ठरलेल्या बारा बलुतेदार धान्य स्वरूपात मोबदल्यावर वर्षानुवर्ष उदरनिर्वाह करत आलेल्या वर्गाच्या समस्या आजही तश्याच पूर्ववत आहेत. त्यांचे दुःख, दारिद्र्य, अवहेलना, अन्याय हे प्रश्न आजही सुटले नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती तर अत्यंत डबघाईची आहे. करोना काळात तर फारच हाल झाले. ह्या वर्गाना सत्तेत सहभागा शिवाय त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्याबरोबर शिक्षणाचा स्थर उंचावण्यासाठी ठोस उपाय योजनांवर विचारमंथन होणार आहे. तरी राज्यातील सर्व बलुतेदार घटकातील बांधवांनी मुंबई येथील अधिवेशना उपस्थित रहाण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष अर्जुन दळे यांनी केले आहे.