नाशिक, दि. ६ सप्टेंबर :- मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे.
मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशन काळात प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. याबाबत आज शासनाच्या वतीने मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात निर्णय घेण्यात आला आहे. त्याबद्दल छगन भुजबळ यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.
त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते की, मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ या महापुरूषांचे तैलचित्र लावण्यात आले आहेत.भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर समाजसुधारक आणि महिला शिक्षणाच्या अग्रणी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांनी विशेषत: महिला शिक्षणासाठी खुप मोलाची भूमिका बजावली आहे. आज भारतामध्ये स्त्री शिक्षणाविषयी निर्माण झालेली जागृती ही महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यामुळेच आहे.महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचले, बालविवाह, सती, केशवपन अशा अनेक क्रूर पद्धतींना त्यांनी विरोध केला. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या तैलचित्राशेजारी महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे अशी मागणी त्यांनी केलेली होती.