नांदेड प्रतिनिधी- येथील मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन समारोहात आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माजी मंञी अशोक चव्हाण यांची झाली. राज्य शासनाच्या विविध स्थगिती निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा प्रचंड त्रास आणि असंतोषाची भावना त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
नांदेड शहरातील मुलभूत सोयीसुविधा विकासासाठीच्या १५० कोटी रूपयांच्या निधी वितरणाला स्थगिती दिल्याने रस्त्यांची कामे रखडली आहेत. ऐन पावसाळ्यात घेतलेल्या या निर्णयामुळे रहदारीची कोंडी व जीविताला धोका निर्माण झाला असून, नागरिकांचे हाल होत आहेत, याकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
महापालिकेचे महात्मा फुले व्यापारी संकुल व जनता मार्केटचा मुद्दा मांडला. या इमारती वापरण्यायोग्य नसल्याने मनपाने नवीन इमारती उभारण्याचा निर्णय घेतला. यामुळे व्यापारी व ग्राहक दोघांनाही सुविधा मिळतील. मात्र, शासनाच्या स्थगितीमुळे बांधकाम रखडल्याचे उपमुख्यमंत्र्यांना सांगितले.
जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या व निविदा स्तरावर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील १८६ कोटी रुपयांच्या १०१ कामांचा मुद्दाही आम्ही उपस्थित केला. सततच्या पाठपुराव्याने ही कामे मंजूर झाली होती. येत्या उन्हाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला असता.
परंतु, या सर्वच कामांवर स्थगिती आल्याने नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. सर्वसामान्यांना होणारा त्रास लक्षात घेता स्थगितीचे संबंधित सर्व निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी आम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली. त्यांनी हे विषय ऐकून घेतले असून, आम्हाला सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन समारोहाला संबोधित करताना जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची भूमिका व्यक्त केली. ही स्वागतार्ह बाब आहे. हा प्रकल्प आम्ही मंजूर करून घेतला होता व तो वेळेवर पूर्ण व्हावा, हीच अपेक्षा आहे.
हा प्रकल्प मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून आम्ही काम सुरू केले होते. प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी २ हजार कोटींची आवश्यकता आहे. मात्र, गेल्या अधिवेशनात केवळ २५० कोटींची तरतूद झाली.येत्या हिवाळी अधिवेशनात आणखी १ हजार कोटी रुपये द्यावेत, अशी आमची मागणी आहे.
कै. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याची मागणीही आम्ही केली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अमृतमहोत्सवी वर्षात हे स्मारक पूर्ण करणे कै. नरहर कुरुंदकरांना आदरांजली ठरेल. नवीन सरकारने हे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. अशी अपेक्षा माजी मंञी अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केली.