ठाण्यातील युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाविकास आघाडीने जनक्षोभ यात्रा काढत सरकारवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांनी या सभेत एकनाथ शिंदे यांना आपण ठाण्यातून निवडणूक लढत जिंकून दाखवू असं जाहीर आव्हान दिलं. दरम्यान आदित्य ठाकरे तसंच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.
शिंदे म्हणाले की, “शिवसेना मोठी करण्यासाठी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. तुमचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. घरावर तुळशीपत्र ठेवलं होतं, म्हणूनच शिवसेना इतकी मोठी झाली. त्यामुळे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या आणि आयत्या पीठावर रेघोटे ओढणाऱ्यांबद्दल मी काय बोलणार? मला त्यांच्यावर बोलण्याची गरज वाटत नाही,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
“ठाण्यात फार अस्वस्थता दिसत असल्याचं मी कालही पाहिलं. त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत. सत्ता गेल्यावर काय परिस्थिती होते हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. मला गुंडमंत्री आणि फडणवीसांनी फडतूस गृहमंत्री म्हणाले. ज्यांच्या काळात इतके मोठे कांड झाले, दोन मंत्री जेलमध्ये गेले, गृहखात्याचे धिंडवडे काढले, विरोधात बोलणाऱ्यांना जेलात टाकलं, नारायण राणेंना जेवणावरुन उठवलं, कंगनाचं घर तोडलं, केतकी चितळेला जेलमध्ये टाकलं, नवनीत राणा आणि रवी राणा यांना जेलात टाकलं. ही केलेली गुंडागर्दी ते विसरले का? तेव्हा ते मुख्यमंत्री होते. आम्ही असं काही केलं नाही,” असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.