राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठा राजकीय भूकंप केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावेत या आशयाचे बॅनर राज्यभरात झळकले. त्यानंतर मनसेचे नेते अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट झाली. या भेटीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात असतानाच आता राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते थाट महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. ‘दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत येणं गरजेचे आहे. ते म्हणजे राज ठाकरे इतर कोणी नाही.’, असे वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले आहे.
मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले. ‘सध्याच्या राजकीय परिस्थिती खूपच भीषण आहे. फक्त राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात नाहीत. त्यामुळेच अशात ‘एक सही संतापाची’ या पद्धतीची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. राज्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी राज ठाकरे यांना लोकांनी सत्तेत बसवलं पाहिजे.’, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.