मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेट संपल्यानंतर पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अशातच जरांगे पाटलांनी आरक्षण मिळूपर्यंत नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात यावी असे आवाहन केले होते. या आवाहनाला मराठा समाजाकडून उत्सुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आरक्षणांसाठी सरकारला दिलेली डेलाईन हुकल्याने मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाने देखील आक्रमक भूमिका नेत्यांना अनेक ठिकाणी प्रवेश बंदी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांना देखील या प्रवेश बंदीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत मराठा समाजाने प्रवेश बंदी केली आहे. मराठा क्रांती मोर्चाने तसं आवाहन अजित पवार यांना केलं आहे. या आवाहनामुळे मराठा आंदोलक आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या शनिवारी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्याआधी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मात्र अजितदादांनी येथे येऊ नये, असं आवाहन मराठा समाज बांधवांनी केलं आहे.