धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाचेच असल्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा
मुंबई (प्रतिनिधी):-शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही २ जुलै २०२३ ला उभी फुट पडली होती. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात दोन गट पडले. ज्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात आला. याचबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु होती. ज्याचा निकाल आज लागला आहे. ज्यात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिला आहे.
”या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार”
निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ”निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे.”
जयंत पाटील म्हणाले, ”या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे.”
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने अजित पवार गटाकडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.