शत्रूवर जरब बसवण्यासाठी आरमार महत्त्वाचे होते -रघुजीराजे आंग्रे
बीड दि.21प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य स्थापनेसाठी आणि त्यानंतरही शत्रूवर जरब बसवण्यासाठी आरमाराचे महत्त्व होते. त्या काळात पोर्तुगीज, इंग्रज डच, फ्रेंच यांच्यासह मुघलांवरही जरब ठेवण्यासाठी या आरमाराचे मोठे महत्त्व होते अशी माहिती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी येसाजी कंक यांचे वंशज रवींद्र कंक, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज संदीप पोतनीस ,प्रा. सत्येंद्र पाटील सर, प्रा.मोराळे सर प्रा. पंजाबराव येडे सर, प्रा.आत्माराम वाव्हळ सर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना रघुजीराजे अंग्रे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी अनेक नर विरांनी बलिदान दिले. स्वराज्य उभे करणे एवढाच विचार त्यांच्यासोबत होता. महाराजांसाठी अनेक मंडळी खांद्याला खांदा लावून लढली. यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले. त्यामुळेच अटक पासून कटक पर्यंत स्वराज्याचा विस्तार झाला. शिवजन्म हे महाराष्ट्राला पडलेले सुंदर स्वप्न आहे असेही रघोजीराजे अंग्रे यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राला आरमाराची माहिती व्हावी, त्यांच्या शास्त्रांची माहिती व्हावी. त्यांच्या कामाच्या पद्धतीची माहिती व्हावी, याबरोबरच महाराजांच्या विचारातून प्रेरणा मिळावी यासाठी आम्ही महाराष्ट्रभर दौरे करणार आहोत. शिवचरित्र हा विषय हत्तीच्या गोष्टी सारखा आहे तो पूर्णपणे समजणार नाही. स्वराज्याच्या विचाराचा मावळा या विचाराने भारावून गेला होता. स्वराज्य फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नाही तर आमच्यासाठी आहे. ते आमचे आहे. हा विचार त्याकाळी होता म्हणूनच महाराजांच्या नंतर हा विचार कायम राहिला. त्यानंतरही या विचाराने भारावलेले मावळे तब्बल 27 वर्षे मुघलांच्या विरोधात लढले. जे लोक विचार करतात त्यांच्यावर देश चालतो .व्यापारी आणि लढवय्या आरमाराची मांडणी कशी होती. या संदर्भात आम्ही महाराष्ट्रातील लोकांना माहिती देणार आहोत. देशाचा विचार केला तर आम्ही पश्चिम किनारपट्टीवर आहोत. आमच्या बाजूला समुद्रकिनारा असल्याने शत्रु पक्षापासून बचाव करण्यासाठी आमचे आरमार सक्षम असले पाहिजे. त्यासाठीच महाराजांनी काळाची पावले ओळखून आरमार सक्षम केले. आजही या किनारपट्टीच्या रक्षणाचे महत्त्व आहे. कारण मुख्यतः व्यापार समुद्रमार्गी चालतो. त्याकाळी ही चालत होता. त्यामुळे त्या काळातही आरमाराला महत्त्व होते. व्यापारी या मार्गाने सोने, चांदी, मोती, घोडे आदींची वाहतूक करत, या ठिकाणी इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगीज यांच्यासह मुघलांचीही नजर होती. त्यामुळेच महाराजांनी आरमार सक्षम करून या शत्रूवर जरब बसवली. महाराजांनी जी वैचारिक शिकवण दिली ती शिकवण आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करते. महाराजांचा विचार टिकला पाहिजे. केवळ आपल्या वाहनावर महाराजांचा फोटो लावून चालणार नाही असे शेवटी आंग्रे म्हणाले.
Related posts:
No related posts.