शीलाचे पालन, एकाग्रतेने मनावर ताबा हाच सद्धम्माचा मार्ग आहे- पु.भंते रत्नदीप थेरो
डॉ.सुजित उत्तम हजारे व डॉ.प्राची नानाभाऊ हजारे यांचा धम्मभूमी शिवनीत सत्कार
बीड : मानवी जीवनामध्ये शीलाचे पालन करुन एकाग्र चित्ताने मनावर ताबा मिळवला तर माणसाचे जीवन सद्धम्माच्या मार्गावर क्रमण करते असे प्रतिपादन पु.भंते रत्नदीप थेरो छत्रपती संभाजीनगर येथील यांनी चैत्र पौर्णिमेनिमित्त दिलेल्या प्रमुख धम्मदेशनेत केले.प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीडच्या वतीने प्रति महिन्याप्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने महाविहार धम्मभूमी डॉ. भदंत आनंद कौसल्यायन नगर, मौजे शिवणी ता.जि.बीड येथे मंगळवार दि.23 एप्रिल 2024 रोजी धम्मदेसना, सत्कार समारंभ व खिरदान कार्यक्रमाचे आयोजन पु. भिक्खु धम्मशील थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते.प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे उपशिक्षणाधिकारी आयु. नानाभाऊ हजारे उपस्थित होते.या पौर्णिमे निमित्त संस्थेला व धम्म हॉलला मिळालेल्या सर्व दान दात्याचे, एमबीबीएस ची पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ.प्राची नानाभाऊ हजारे आणि डॉ.सुजीत उत्तम हजारे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम तथागतांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व उपस्थितांना त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यास दिले.पु .भंते रत्नदीप थेरो पुढे म्हणाले की, श्रध्दायुक्त चित्ताने दान देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा प्रकारचे दानच सर्वश्रेष्ठ आहे. तथागतांचा धम्म आद्य कल्याणम्, मध्य कल्याणम् व अंत कल्याणम्’ आहे. हे अनेक उदाहरणे देवून स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे बीड जि.प.चे उपशिक्षणाधिकारी आयु.नानाभाऊ हजारे आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की, जेथे चिकीत्सकता, स्वतंत्र बुध्दीने विचार केला जावू शकतो, जिथे स्त्री-पुरुष समानता, कोणत्याही प्रकारचा उच्च-नीचपणा नाही असा शांतीचा, समतेचा, मैत्रीचा व करुणेचा मार्ग दाखविणारा धम्म व आपणा सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. त्यांच्या विचारानुसार जीवनात आचरण करणे गरजेचे आहे.डॉ.प्राची नानाभाऊ हजारे आणि डॉ.सुजीत उत्तम हजारे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.समारोप प्रसंगी पु. भिक्खु धम्मशील म्हणाले की, तथागतांनी सांगितलेले चार आर्य सत्य समजावून घेवून पंचशील, आर्य आष्टांगिक मार्ग व दाहा पारमिता समजावून घेण्या करीता अशा प्रकारच्या धम्मदेसनेची नेहमी नेहमी गरज आहे; तरी प्रत्येकाने दर रविवारी आपल्या कुटूंबासह विहारात जावून धम्मदेसना ऐकणे, धम्मग्रंथ वाचणे व त्यानुसार आचरण करणे गरजेचे आहे. असा उपदेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी. एम भोले तर आभार प्रदर्शन प्रा.अशोक गायकवाड यांनी केले.