भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होते
सुशी येथे अखंड हरिनाम सप्ताहात किरण महाराज मोटे यांचे प्रतिपादन
गेवराई :मनुष्य जीवनात प्रत्येकाने चांगले कर्म केले पाहिजे कारण कर्म कुणालाही चुकत नाही. प्रत्येकाने एकमेकांशी सौजन्याने रहावे. सध्या रामायण आणि महाभारत आचरणात आणणे गरजेचे आहे. तसेच भगवंताचे नामस्मरण, चिंतन करुन प्रत्येकाने शुद्ध अंतकरणाने भगवत भक्ती करावी यामूळे निश्चितच भगवंताची प्राप्ती होते कारण संप्रदायात भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन किरण महाराज मोटे यांनी व्यक्त केले.
स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा सद्गुरू श्री नगदनारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सुशी (व) येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी महंत ह.भ.प.वै.महादेव महाराज यांच्या आशीर्वादाने व महंत ह.भ.प.गुरुवर्य शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या प्रेरणेने व शुभहस्ते महंत ह.भ.प. दत्तात्रय महाराज गिरी व श्री ह.भ.प.महंत संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या ३७ व्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिले कीर्तनरुपी पुष्प गुंफताना ते बोलत होते.
यावेळी शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांच्या आवडे देवासी तो ऐका प्रकार ।। नामाचा उच्चार राञंदिवस ।।१।तुळशीमाळ गळा गोपीचंद टिळा ।। ह्रदयी कळवळा वैष्णवांचा ।।२।।आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ।। साधन निर्धारी आण नाही ।।३।।एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम ।। तो देवा परम पुज्य जगी ।।४। या अभंगावर त्यांनी चिंतन केले यावेळी पुढे बोलताना किरण महाराज म्हणाले की आई- वडिलांची सेवा करा, स्त्रीभ्रूणहत्या करुन नका. मोबाईलचा वापर कमी करा तसेच ज्याचा जन्म झाला त्याला एकनाऐक दिवस जावं लागते म्हणून प्रत्येकाने एकमेकांशी सौजन्याने वागावे तसेच देवाचे नामस्मरण करा चिंतन करा असा मौलिक सल्लाही शेवटी बोलताना त्यांनी दिला. यावेळी पंचक्रोशीतील टाळकरी वारकरी, भजनी मंडळ तसेच महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.