मुंबई : “भर दिवसा खून केलेल्या गुंडाचं महिमामंडन होणं चुकीचं आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे हा कारागृहातून सुटला कसा याचा तपास व्हायला पाहिजे,” अशी मागणी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. कुख्यत गुंड गजा मारणे सोमवारी (15 फेब्रवारी) तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन केले होते. गजा मारणेच्या समर्थनार्थ त्याची तब्बल 300 गाड्यांचा ताफ्यात रॅली काढण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस तसेच राज्य सरकारवर टीका झाल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आले. या प्रकरणावर बोलताना फडणवीस यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
“गजा मारणे हा गुंड आहे. तो तळोजा कारागृहात बंद होता. त्यांची सुटका झाली. भर दिवसा खून केलेल्या गुंडाचं महिमामंडन होणे चुकीचं आहे. मूळात मारणे हा कारागृहातून सुटलाच कसा?,” असा सवाल फडणवीस यांनी केला. तसेच, या प्रकरणाचा तपास व्हायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया :
काय आहे प्रकरण?
कुख्यात गुंड गजानन मारणे सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून बाहेर आला. त्यावेळी कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने त्याचे समर्थक जमले होते. गजानन मारणे याच्या सुटकेनंतर त्याच्या पिलावळीने एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केले. पिंपरी – चिंचवडच्या हद्दीतून सायंकाळी पुण्याच्या दिशेने मारणे आणि त्याच्या समर्थकांचा ताफा गेला. या ताफ्यात जवळपास 300 गाड्या होत्या. यापैकी एकाही गाडीने टोल भरला नाही. या रॅलीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात होते. यानंतर एका कथित गुंडाच्या अशा वागण्याची माहिती पोलिसांना समजली का नाही, असा सवाल विचारला जात होता. तसेच, या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारवरसुद्धा टीका केली गेली. त्यानंतर गजानन मारणे याला अटक करण्यात आली.
सरकार अस्तित्वहीन झालंय
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सराकरवर टीका केली होती. त्यांनी हे सरकार अस्तित्वहीन झाल्याचं म्हटलं होतं. “महाविकासआघाडी सरकारच्या काळात खून किंवा बलात्कार ही एखाद्या सामान्य घटनेसारखी बाब झाली आहे. पण आता तुरुंगातून सुटल्यावर नामचीन गुंड मिरवणूक काढायची हिंमत करु लागले आहेत. हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचा पुरावा आहे,” असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.