पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पालिकेच्या कामाचे बिंग फुटले
शहरांतर्गत रस्त्यावरून चालणे अवघड, घाणीचे साम्राज्य.करोडो रुपये गेले कुठे ?
परळी वैजनाथ : दि 5 (प्रतिनिधी)
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्व मोसमी पावसाने परळीकरांची दैना उडाली असून शहरातील अनेक भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होऊन तळ्याचे स्वरूप आले होते. अनेक भागात भुयारी गटार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते उकरून टाकल्याने रस्त्यावर चिखल ही जास्त झाल्याने शहरातील अनेक भागात मोटारसायकल चालविणे तर सोडाच पायी चालणे ही तारेवरची कसरत केल्याप्रमाणे बनले आहे.परळी नगर परिषदेने शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुठं खर्च केला हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
यावर्षी मान्सुम पूर्व पाऊस मागील 2 दिवस परळी शहरात बरसला.यापावसाने शेतकरी वर्ग समाधानी झाला तरी परळीकर मात्र त्रस्त झाले आहेत.परळी शहरातील अनेक प्रभागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले होते.अनेक भागात नाल्या तुंबल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने हे पाणी रस्त्यावरच साचले परिणामी या रस्त्यावरून दुचाकी वाहने तर सोडा पायी चालणे ही शक्य झाले नाही.
शहरातील सावतामाळी परिसर,पंचवटी नगर,औद्योगिक वसाहत या भागात तर चक्क रस्त्यावर पाणी जमा होऊन तळे झाल्यागत परिस्थिती निर्माण झाली होती.यातच भर म्हणजे भुयारी गटार निर्मितीचे काम शहरात सुरू असल्याने अनेक भागातील चांगले रस्ते उकरून टाकल्याने रस्त्यावर चिखल मोठ्या प्रमाणात झाल्याने मोटारसायकल घसऱण्याचे प्रकार घडले.
शहरातील अनेक भागात नाले साफसफाईचे मान्सुमपूर्वची कामे नियोजनबद्ध व काळजीपूर्वक न झाल्याने झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने परिणामी पाणी साचून राहू लागले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
परळी शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाची कामे झाली व होत आहेत पण ही कामे नेमकी कोणती व कुठं होत आहेत असा प्रश्न शहरातील नागरिक पडला आहे.2 दिवसावर मान्सूनला सुरुवात होणार असून वेळीच याकडे लक्ष देऊन कार्यवाही न झाल्यास या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार हे निश्चित आहे.