नवी दिल्ली | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार दिल्लीत असून ते विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांना भेटणार आहेत. आता त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चला उधाण आले आहे. आजारपणानंतर पवार दिल्लीत गेलेच नव्हते. मध्यंतरी दोन वेळा त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र शरद पवारांना डॉक्टरांनी प्रवास न करण्याचं सांगून आराम करण्याचा सल्ला दिला होता. प्रकृती व्यवस्थित झाल्याने त्यांनी लांबवलेली दिल्ली भेट आता केली आहे. यातून कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढू नये, असे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे. मात्र पवार विरोधी पक्षाच्या नेत्यांची घेत असलेल्या भेटीवरून गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत चर्चा सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांची दिल्ली भेट, नंतर शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेले पत्र, या पार्श्वभूमीवर पवार यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढणे सुरू झाले. त्यावर मलिक म्हणाले की, याचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. पक्षाचे नेते पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याच्या दौर्यावर तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत.