रायगड ,कर्जतमध्ये वर्षासहलीसाठी आलेल्या तिघांचा बुडून मृत्यू
पाली-भूतीवली धरण परिसरातील घटना
कोकण संपादक / भरत सरपरे
रोहा प्रतिनिधी / रुपेश कांबळे
कर्जत । कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणाच्या जलाशयात पाणी घेऊन येणार्या धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (10 जुलै) दुपारी घडली. या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे. पावसाने आज सकाळपासून उघडीप दिलेली असताना मुंबई कुर्ला येथील सहा जण या धब्याधब्यावर फिरायला आली असताना ही घटना घडली.
मुंबई कुर्ला येथील नानीबाई चाळ नौपाडा येथील सहा पर्यटक आज वर्षासहलीसाठी कर्जत तालुक्यात आले होते. सामान्य लोकांना रेल्वे प्रवास बंद असल्याने ते सहाजण रिक्षा घेऊन कल्याण-कर्जत रस्त्याने कर्जत तालुक्यात आले होते. ती रिक्षा यापूर्वी कर्जत तालुक्यात वर्षासहलीसाठी आल्याने डिक्सळ येथे नाष्टा करून ते सर्व पाली भूतीवली धरणावर पोहचले.
डिक्सळ नाक्यावरून पाली वसाहत येथे चालत जाऊन सागाचीवाडी आणि चिंचवाडी पायवाटेवरील एका धबधब्यावर ते सहाजण दुपारी बारा वाजण्याच्यादरम्यान पोहचले होते.
धबधब्यावर मौजमजा करीत असताना त्यातील काही जण धबधब्याला पाणी कमी असल्याने पाली भूतीवली धरणाच्या जलाशयात उतरले. ज्या ठिकाणी पाली गाव होते, त्या ठिकाणी खोलगट भाग असून जुन्या मोडून टाकलेल्या घरांचे अवशेषदेखील आहेत. त्यामुळे त्या पाण्याचा अंदाज नसल्याने वर्षासहलीसाठी आलेले पर्यटक हे त्या पाण्यात बुडाले. एकूण चार पर्यटक त्या ठिकाणी धरणाच्या पाण्यात उतरले होते, मात्र त्यातील एक पाण्याच्या बाहेर येण्यात यशस्वी ठरला असून अन्य तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.