नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी मोर्चा काढून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध दर्शवत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती.
आता त्या पाठोपाठ हा लढा आणखी चिघळताना दिसून येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी ९ ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत १ ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात आली.
विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यावे असे भूमिपूत्रांचे ठाम मत असतानाही ठाकरे सरकार याची दखल घेत नाही. त्यामुळे कृती समितीने ऑगस्ट क्रांती दिनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. यासंदर्भात रूपरेषा, नियोजन आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.