राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या होत्या. संकटामुळे रखडल्या होत्या. या रखडलेल्या निवडणुकांचं बिगुल आता लवकरच वाजण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच निवडणुकांच्या तोंंडावर राष्ट्रवादी नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मतदार याद्यांवरुन जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
या संदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले की, राज्यातील बऱ्याच ठिकाणी दलित आणि मुस्लिम समाजातील लोकांची नावे मतदार याद्यांमधून गहाळ झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी यासंबंधित एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यावर देखील थेट आरोप केला आहे.
मुंब्राच नाही तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मतदार संघातील मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात आला आहे. माझ्या मतदार संघातील देखील २० ते ४० हजार नावे वगळण्यात आली आहेत. नाव वगळताना ते मतदार स्थलांतरीत झाल्याचा शेरा देण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात ते लोक कोठेही स्थलांतरीत झाले नाहीत, तिथेच राहत आहेत. मग ही नावे बदलली कोणी?, असा सवाल आव्हाडांनी केला आहे.