मुलांच्या लसीकरणाच्या नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या निर्णयाला एका वरीष्ठ शास्त्रज्ञाचा विरोध
नवी दिल्ली (प्रतिनिधी) -: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर एका वरीष्ठ शास्त्रज्ञाने या निर्णयाला विरोध केला आहे. सरकारचा हा निर्णय ‘अशास्त्रीय’ असून यामुळे कोणताही फायदा होणार नाही, असा या शास्त्रज्ञाचा दावा आहे.
डॉ. संजय के. राय असे या शास्त्रज्ञाचे नाव असून ते दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयातील वरीष्ठ साथरोग तज्ज्ञ आहेत. प्रौढ आणि लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लशीच्या झालेल्या चाचण्यांमध्ये त्यांनी प्रमुख संशोधक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे त्यांनी सरकारच्या निर्णयावर केलेल्या टीकेला महत्त्व आले आहे. आपल्या देशात लहान मुलांना लस देण्यास सुरुवात करण्यापूर्वी, इतर ज्या देशांमध्ये मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे, तेथील अहवालांचे विश्लेषण करणे आवश्यक असल्याचे डॉ. राय यांचे म्हणणे आहे. राय म्हणाले की, ‘‘देशाची निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या पंतप्रधान मोदींचा मी मोठा चाहता आहे. मात्र, लहान मुलांचे लसीकरण सुरु करण्याच्या त्यांच्या पूर्णपणे अशास्त्रीय निर्णयामुळे मी नाराज झालो आहे. कोणतीही मोहिम सुरु करण्यापूर्वी उद्दीष्ट स्पष्ट असणे आवश्यक असते. याबाबतीत, एक तर कोरोना संसर्ग रोखणे किंवा गंभीर आजारपण रोखणे किंवा मृत्यू रोखणे असे उद्दीष्ट आहे. मात्र, आपल्याकडे लशीबाबत जी काही माहिती आहे, त्यावरून या लशी संसर्ग पूर्णपणे रोखण्यास उपयुक्त नाहीत. अनेक देशांमध्ये बूस्टर डोस घेतलेल्यांनाही संसर्ग झाला आहे. त्यामुळे, कोरोना प्रतिबंधक लस ही संसर्ग रोखण्यास नव्हे, तर कोरोनामुळे गंभीर आजारपणे येण्याची किंवा मृत्यू होण्याची शक्यता कमी करते, हे सिद्ध होते.’’ डॉ. राय हे इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. त्यांनी पंतप्रधानांचा निर्णय प्रसिद्ध करणाऱ्या पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटलाच प्रत्युत्तर देत आपले म्हणणे मांडले आहे.
डॉ. राय यांचे स्पष्टीकरण
कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दीड टक्का, म्हणजे दर दहा लाख बाधितांमागे १५ हजार जणांचा मृत्यू होतो. लसीकरणामुळे यातील ८० ते ९० टक्के मृत्यु टाळता येऊ शकतात. त्यामुळे प्रौढांमध्ये लसीकरणाचे मोठे फायदे आहेत. मात्र, लहान मुलांचा विचार करताना संसर्गामुळे गंभीर आजारी पडण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून दर दहा लाख बाधित मुलांमागे केवळ दोन जणांचा मृत्यू होतो, असे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. काही वेळा लशीचा शरीरावर होणारा विपरित परिणाम लक्षात घेता, मुलांना लस दिल्यामुळे होणाऱ्या फायद्यापेक्षा तोटाच अधिक होण्याची शक्यता अधिक आहे, असे स्पष्टीकरण डॉ. संजय राय यांनी दिले आहे.