पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने जामीन नाकारला आहे. पण, कोर्टाच्या परिसरात बोलण्यास कोणतीही बंधन घालण्यास स्पष्ट नकार देत पोलिसांचे चांगलेच कान उपटले आहे.हे प्रकरण राजकीय नाही, ईडीचा कोणताही विरोध नाही, मग तुमच्या पोटात का दुखतंय असं म्हणत कोर्टाने पोलिसांना फटकारून काढले आहे. संजय राऊत हे कोर्टाच्या परिसरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलले. दोनदिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासोबतही चर्चा केला होती. त्यांच्या या चर्चेचा तपशील प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला.
त्यामुळे पोलिसांनी संजय राऊत यांना भेटणाऱ्यांना प्रतिबंध घालावे, कोर्ट आदेशानुसार फक्त वकील आणि मान्यताप्राप्त कुटुंबीय संजय राऊत यांच्यासोबत बोलण्यापासून, पत्रकारांनाही रोखण्याचे आदेश असल्याची माहिती देण्यात आली. पण, कोर्टाने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली आहे.
संजय राऊत हे कोर्टामध्ये माध्यमांसोबत बोलत असल्यामुळे पोलिसांनी न्यायाधीशांकडे तक्रार केली. यावर न्यायाधीशांनी पोलिसांचे चांगलेच कान उपटले.
‘तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हीच म्हणता की हे राजकीय केस नाही, मग ते लोकप्रतिनिधी आहेत किंवा आरोपी आहे जे बोलतात. याबाबत ईडीला काहीच अडचण नाही, असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना झापलं. यावर पोलीस म्हणाले की, सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांच्या या उत्तराने न्यायाधीश संतापले.
इथे काय गोळीबार होईल का? लेखी द्या, मग मी त्यावर निर्णय घेईल. मी बाहेर जाऊन सुरक्षा बघू शकत नाही. इतर आरोपींना चहा प्यायला नेतात, डबा खातात. जर ते राजकीय विधान करत असतील तर ईडीला काय अडचण आहे कारण ही राजकीय केस नाही, असे ईडीच म्हणत आहे. कोर्टाच्या बाहेरची गर्दी मी नियंत्रणात आणू शकत नाही. बाहेर लोक राऊत यांना भेटत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. जर कोणी बंदुक, चाकू आणला तर गोष्ट वेगळी आहे’ असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना आणि ईडीला खडेबोल सुनावले.