मराठी महिलेला मुलुंडमधील शिवसदन सोसायटीमध्ये गुजराती पिता-पुत्राने जागा नाकारल्याची घटना गेल्या आठवड्यात उघडकीस आली होती. आहे. या घटनेनंतर आता सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. मराठी माणसाची महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे, याला एकनाथ शिंदे आणि भाजप जबाबदार असल्याचे संजय राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या परिस्थितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप जबाबदार आहे. त्यामुळेच शिवसेनेला कमकुवत करण्यात आले. मुंबईमधील मराठी माणसाचा आवाज, ताकद संपवण्यासाठीच भाजपने शिवसेना तोडली आहे. शिवसेना तोडण्याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज दाबला जाईल. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक बेईमान आहेत, हे सर्व जबाबदार आहेत.”
आगामी निवडणुकीत भारत-पाकिस्तान नाही, तर भारत-खलिस्तान असा मुद्दा येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, “आज कॅनडात सुरुवात झालीय, यानंतर ब्रिटनमध्ये आले, आता हळूहळू दिल्लीत येतील. मग 2024 पर्यंत संपूर्ण वातावरण खराब केल्यानंतर आता देशाला कसा धोका आहे आणि एकच आपला नेता आहे, बाकी कोणीच नाही? असे सांगत भाजप प्रचार करेल”, अशा शब्दात संजय राऊत यांनी निशाणा साधला.