राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप, शिवसेना(शिंदे, ठाकरे गट), राष्ट्रवादी(दोन्ही गट) यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसेने) लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून विरोधकांच्या चिंतेत मनसे भर घालणार आहे.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. मनसे यंदाची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवेल असे म्हटले जात आहे.
मात्र मनसेवर नेहमीच आपल्या भूमिका बदलण्याचा आरोप होतो. टोलचा विषय असू दे, की नरेंद्र मोदी यांना आधी पाठिंबा मग विरोध असू दे, की मराठी माणसावरून थेट हिंदुत्वाचा विषय असू दे. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसे वेळोवेळी आपल्या भूमिका बदलतात असे म्हटले जाते. यात अजून एका भूमिकेची भर पडली असल्याचे समोर येत आहे.