मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे. मी गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते; पण मी त्यांचे ऐकले नाही. कोणालाही कोपरेकापरे गाठू दिले नाही अन् कानात कुजबूज करू दिली नाही. समाजाशी गद्दारी न केल्यामुळे लाखो लोकांचे पाठबळ मिळत आहे. आंदोलनाचा रथ पुढे गेला असून, मराठा आरक्षणाशिवाय माघार नाही,’ असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी माध्यमाच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी आंदोलनाबाबत मनमोकळा संवाद साधला. जरांगे यांच्या विराट सभेच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारण्यास होकार दिला आहे. राज्य सरकारने उशिराने हालचाली सुरू केल्या का, असे विचारता जरांगे यांनी ‘पुढील आठ दिवसांत आरक्षणाचा पेच सोडविणार की ठेवणार हा प्रश्न सरकारचा आहे.
मराठ्यांचा परंपरागत व्यवसाय शेती असल्यामुळे कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्यावीत, अशी आमची मागणी आहे. सन १९२३पासून आम्ही आरक्षणासाठी पात्र आहोत. हक्काचे आणि ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. कारण ५० टक्क्यांवरील आरक्षण टिकत नाही, हे पक्के माहीत आहे. दोन आयोगांनी ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिले. त्या दोन्ही वेळी दगाफटका झाला. हक्काचे आरक्षण असताना आम्हाला ५० टक्क्यांपलीकडील आरक्षण का देता,’ असा सवाल केला.