अमरावती- महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिक्षा मंडळाचे विभागीय कार्यालय अमरावती विभागासाठी मंजुर करण्यात आलेले असून, ते २०२३-२४ या वर्षापासून तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे अमरावती शहर प्रमुख आशिष ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यातील शासकीय व खाजगी तंत्रनिकेतने, औषधनिर्माण अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या सारख्या तांत्रिक संस्थांचा परिक्षा संबंधी कारभार बघण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परिक्षा मंडळाचे विभागीय कार्यालय,नागपूर येथे कार्यरत असून, या कार्यालया मार्फत भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ या जिल्हयातील शैक्षणीक कारभार चालतो.
संस्थाचे वार्षिक सलग्नीकरण, परिक्षा अर्ज भरणे, पडताळणी, खात्री करणे, गुणपत्रिका वाटप, बदल, संस्था नोंदणी, शुल्क भरणे, फॅकल्टी भेटी कार्यक्रम, नामांकन करणे, विषय बदल, पदविका वाटप यासारखी विद्यार्थ्यांशी सबंधित महत्वपूर्ण कामे या कार्यालयाचे माध्यमातुन होत असतात. तसेच अधिकारी वर्गांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम तंत्रशिक्षण परिक्षा मंडळाचे माध्यमातुन राबविले जातात. परिक्षेसबंधी कामाकरीता कर्मचारी वर्गाला नेहमीच म.रा.तं.शि.मंडळाच्या विभागीय कार्यालयात नागपूर येथे सातत्याने ये-जा करावी लागते. हे जाणे-येणे अमरावती विभागातील टोकावरील बुलढाणा,वाशिम,अकोला जिल्हयातील विदयार्थी, पालक, अधिकारी व कर्मचारी यांना खूप आर्थिक व मानसिक दृष्टया खूप तापदायक ठरते.
त्यामुळे शासनाच्या विरुद्ध विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ 1997 च्या तरतुदीनुसार राज्यातील सर्व विभागांच्या ठिकाणी पारिक्षा मंडळाची कार्यालये या धोरणानुसार अमरावती येथे मंजूर करण्यात आलेले विभागीय कार्यालय २०२३-२४ या शैक्षणीक वर्षातच तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी अमरावती शिवसेनेनेचे शहर प्रमुख आशिष ठाकरे (शिंदे गट) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री, जिल्हयातील खासदार, आमदार यांचे कडे निवेदनाद्वारे केलेली आहे.