शारदा स्पोर्टस् ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडित
गेवराईत उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबीराचा भव्य शुभारंभ
गेवराई, दि.04 (प्रतिनिधी) ः- शारदा स्पोर्टस् ॲकॅडमीच्या माध्यमातून गेवराई तालुक्याच्या ग्रामीण भागातून खेळाडू नावारुपाला आले असून ते राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. यापुढील काळातही शारदा ॲकॅडमीच्या माध्यमातून बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी अशा विविध क्रीडा प्रकारांत आपल्या भागातील खेळाडू करीअर करतील असा विश्वास व्यक्त करून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष अमरसिंह पंडित यांनी केले. शारदा कबड्डी ॲकॅडमीच्यावतीने गेवराई शहरात आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
शारदा स्पोर्टस् ॲकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा कबड्डी ॲकॅडमीच्यावतीने गेवराई शहरात शुक्रवार, दि.3 मे रोजी उन्हाळी प्रशिक्षण कबड्डी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष अमरसिंह पंडित, कोषाध्यक्ष मंगल पांडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू महादेव शेजूळ, अहमदनगर कबड्डी असोसिएशनचे विजयसिंह मिख्खन, प्रो कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू आकाश शिंदे (पुणेरी पलटन कप्तान), शिवम पठारे (हरियाणा स्टिकर), अजित पवार (तेलगू टायटन्स), प्रफुल्ल झावरे (तेलगू टायटन्स), राष्ट्रीय खेळाडू सौरभ राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, किशोर कांडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, शारदा ॲकॅडमीचे काम अनेक वर्षांपासून उत्कृष्ट पध्दतीने सुरु आहे. गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कोच उपलब्ध करून दिलेले आहेत. सुसज्ज ग्राऊंड, इनडोअर हॉल, कबड्डी खेळासाठी मॅटसह सज्ज मैदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यापुढील काळात एकाच ठिकाणी स्विमींग पुल तसेच बॅडमिंटन, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल इत्यादी खेळांचे मैदान आणि खेळाडूंसाठी निवासी हॉस्टेल उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. भविष्यामध्ये कबड्डी राज्य असोसिएशनच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर येथे कबड्डी स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शारदा स्पोर्टस् ॲकॅडमीच्या पाच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर ॲकॅडमीचे नाव मोठे केले असून हे ॲकॅडमीचे भव्यदिव्य यश आहे असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना मंगल पांडे म्हणाले की, लोकप्रिय नेते अमरसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्याचा सर्वांगिन विकास रस्ते, जलसिंचन सुविधा या पुरताच मर्यादित न ठेवता या भागातील विद्यार्थी तंदुरुस्त राहण्यासाठी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिलेले आहे. राज्यस्तरीय कबड्डी सामने घेवून महाराष्ट्रातील नामांकित खेळाडूंना या भुमीत निमंत्रित केले. क्रीडा क्षेत्रातील हे काम अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रणवीर पंडित आता शारदा ॲकॅडमीच्या माध्यमातून करत आहेत. ॲकॅडमीच्या नियोजनामध्ये खेळाडूंना प्रशिक्षण दिल्यामुळे या भागातील खेळाडूंनी प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये यश मिळवले आहे. अमरसिंह पंडित आणि रणवीर पंडित यांच्या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत असेही ते यावेळी म्हणाले. प्रशिक्षक मानसिंग राठोड, भिमा माने, खेळाडूचे पालक तुशार शिंदे आणि अनिल पठारे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रो कबड्डीतील राष्ट्रीय खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारदा स्पोर्टस् ॲकॅडमीचे प्रशिक्षक डॉ.केतन गायकवाड यांनी केले. यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक अनिल राठोड, अनिल जगदाळे, शंतनू पांडव, अमर सुपेकर, प्रा.राजेंद्र बरकसे, माने सर यांच्यासह सरवरभाई, कांता नवपुते, बाळासाहेब सोनकांबळे, शेख मकसुद, नविद मशायक, शांतीलाल वाव्हळ, अक्षय पवार, अमित वैद्य, विष्णू घोंगडे, शिवाजी ढाकणे, सोमनाथ मोटे यांच्यासह क्रीडा रसिक, खेळाडू, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.