मराठवाड्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या – बबनराव लोणीकर
महायुतीचा धर्म निभावत
पंकजाताईंना मताधिक्य देणार – अमरसिंह पंडित
महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ गेवराईत मेळावा
गेवराई, दि.७ (प्रतिनिधी) ः- मराठवाड्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तयार केलेली महत्वाकांक्षी योजना उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना रद्द केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून पन्नास हजार कोटी रुपये मंजुर करून ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सध्या आम्ही करत आहोत. मराठवाड्यावरील दुष्काळाचा कलंक कायमस्वरुपी पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून देण्याचे आवाहन माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी केले. महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे निभावत गेवराई विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक मताधिक्य देवून असा विश्वास माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. गेवराई येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
बीड लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या अधिकृत उमेदावार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ सोमवार, दि.6 मे रोजी गेवराई येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री तथा भाजपाचे निरीक्षक आ.बबनराव लोणीकर, जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जालना भाजपाचे युवा नेते विश्वजित खरात, रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, भवानी बँकेचे उपाध्यक्ष मोहम्मद गौस यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी बोलताना माजीमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, मराठवाड्याच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटविण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री असताना मराठवाडा वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प मंजुर केला. तज्ञांच्या समितीने 35 वर्षांच्या पर्जन्यमानासह इतर बाबींचा अभ्यास करून या प्रकल्पाचा डीपीआर तयार केला होता. निविदा प्रक्रिया सुरु झालेली असताना तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द केला. नितीन गडकरी यांच्यासारख्या परिवहन मंत्र्यांच्या माध्यमातून 69 हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे होवू शकली. शेगाव ते पंढरपूर हा मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा पालखी मार्ग दोन हजार कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आला. प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीने देशात रस्त्यांचा विकास करण्यात त्यांना यश आले आहे. भविष्यातही नरेंद्र मोदी हेच देशाचे प्रधानमंत्री होणार असल्यामुळे आपल्या मतदार संघाचा विकास करण्यासाठी सत्तेतील पक्षाचा खासदार निवडून द्या, बीड जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व करण्यासाठी पंकजाताईंना प्रचंड मताधिक्याने लोकसभेत पाठविण्याचे आवाहन बबनराव लोणीकर यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शेती, सिंचन यांसह विविध विषयांचा दांडगा अभ्यास असलेले नेतृत्व अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून गेवराईकरांना लाभले आहे. सिंदफणा नदीवरील बंधाऱ्यांची श्रृंखला, तलवांचे साठवण तलावात रुपांतर आणि राक्षसभुवनचा बॅरेज अशी विविध विकासकामे करण्याची त्यांची तळमळ आम्हाला दिसत आहे. गोदावरी नदीतील अतिरिक्त पाणी आंध्र प्रदेशात वाहून जात आहे, यासाठी त्यांनी सातत्याने विधानसभेत आवाज उठविला त्याचा मी साक्षीदार आहे. भैय्यासाहेबांनी मागणी केलेल्या बंधाऱ्यांच्या मंजुरीसाठी अर्ध्या रात्री सुध्दा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी स्वतः जाईल आणि ते सुध्दा नक्की मदत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाला महासत्ता बनविण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महायुतीचा धर्म निभावत गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. स्व.गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना गेवराई मतदार संघातील मतदार प्रचंड मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. पंकजाताईंच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या भाषणात अमरसिंह पंडित यांनी शेती आणि सिंचन विषयक विकास कामांवर भर दिला.
प्रास्ताविक गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केले.
यावेळी दिपक आतकरे, गजानन काळे, नंदकिशोर गोर्डे, जगन पाटील काळे, विकास सानप, इमू पटेल, सुनिल देशमुख, विष्णूपंत घोंगडे, अप्पासाहेब पाटील, विकास सानप, फुलचंद बोरकर, जगन्नाथराव शिंदे, कुमारराव ढाकणे, अनिरुद्र तौर, सुभाषराव मस्के, मिनहाज शेख, संभाजीराव पवळ, उत्तमराव सोलाने, तुकाराम मस्के, संग्राम आहेर, जयदिप औटी, अक्षय पवार, जयसिंग माने, संदिप राजगुरु, बाबुराव काकडे, गणपत नाटकर, रवि शिर्के, खालेद कुरेशी, नवीद मशायक, खाजामामू, नजीब सय्यद आदी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुमारराव ढाकणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले तर माधव चाटे यांनी सुत्रसंचलन केले.