‘तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा?’, अमोल मिटकरींचा पडळकरांवर निशाणा.
🔸अशोक काळकुटे | संपादक
“तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
मोहनराव शिंदे साखर करखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांचे शिवचरित्र्य व्याख्यान म्हैसाळ येथे आयोजित केले होते. यावेळी मिटकरी यांनी भाजप, केंद्र सरकार आणि पडळकरांवर नाव न घेता सडकून टीका केली.
मी नागज फाट्यावर दारू विकली नाही किंवा कोणत्या आजीची दोन कोटींची जमीन बळकावली नाही. मी कुत्र्यांना भीत नाही”, असा घणाघात मिटकरी यांनी केला. “तुम्हाला काय वाटतं, हे सोपं असतं. एखादं श्वान बैलाच्या मागे भूंकतं. बैल एकदा, दोनदा ऐकतो, तिसऱ्यांदा मात्र लाथ मारतो. बैलाने लाथ मारल्यानंतर कुत्रा मागेच जातो”, असा टोला त्यांनी लगावला.
“आम्हाला ज्यांनी आमदार केलं आहे ते आमचे गुरुही काही कमी नाहीत. विरोधासाठी विरोध नाही करायचा. शांत बसायचं. पण टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम वाजवायचा”, असं मिटकरी यावेळी म्हणाले.
“थांबा! वेट ॲण्ड वॉच. भलेभले संपले बेट्या. तू कोणत्या गल्लीचा खसखस आहेस राजा. त्याच्यामुळे बोलताना सुद्धा नीट आणि सांभाळून बोललं पाहिजे”, असंदेखील ते म्हणाले. यावेळी मिटकरी यांनी तरुणांना १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, जेजुरीतल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळाच्या हस्ते केल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात खळबळ उडाली होती. याच मुद्द्यावरुन मिडीयाशी बोलताना पडळकर आणि अमोल मिटकरी यांच्यातही मोठा वाद झाला होता.