..तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत-संजय राऊत.
🔸अशोक काळकुटे | संपादक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन काल मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे पोहरादेवीत गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले आहे. पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि खा.शरद पवार नाराज आहेत का? याबाबत बोलण्यास मात्र संजय राऊत यांनी नकार दिला.
काय आहे पोहरादेवी गर्दी चे कारण?
वनमंत्री संजय राठोड हे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत कारण बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणची टिक-टॉक स्टार पूजा चव्हाण हिचा पुण्यामध्ये मृत्यू झाला या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव वारंवार येत असल्याने संजय राठोड तब्बल पंधरा दिवस संपर्कात नव्हते. यानंतर काल ते पोहरादेवी या ठिकाणी गेले असता त्यांच्या समर्थनार्थ त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या दरम्यान त्यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.
परंतु त्यांच्या समर्थनार्थ जमलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असल्याने विरोधकांकडून आता वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत हे मिडीयाशी बोलत होते…