सातारा : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची NIA कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. तसेच या घटनेवरून विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवरून आघाडी सरकार बॅकफूटवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती.
आता विरोधकांकडुन केल्या जाणाऱ्या या टीकेला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. सचिन वाझे व हिरेन प्रकरणात महाराष्ट्र सरकार बॅकफुटवर गेलेले नाही असे मत यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
साताऱ्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सातारा पोलिसातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक गृह राजेंद्र साळुंखे व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांनी संवाद साधताला सचिन वाझे प्रकरणावर भाष्य केले होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणा (NIA ) करत असल्याने त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही. मात्र मुंबई पोलिसांनी आजपर्यंत अनेक किचकट व मोठ्या गुन्ह्यांच्या तपासातून आपले कौशल्य सिद्ध केले आहे त्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेणे योग्य नाही, असे देसाई यांनी यावेळी स्पष्ट बोलून दाखविले होते.