तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि दुसऱ्या पायावर दिल्ली जिंकेन, असा अजब दावा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हुगळी जिल्ह्यातील देवानंदपूर येथे केला आहे.
तसेच भाजपच्या उमेदवार निवडीवर देखील ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या की ज्या पक्षाला स्वतःचे स्थानिक कार्यकर्ते तयार करता आले नाहीत ते बंगालमध्ये येऊन निवडणूक लढवत आहेत. तृणमूळ काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केडर फोडून भाजपने उमेदवारांची यादी तयार केली आहे.
आज पाहिलं तर त्यांच्या नेत्यांना साधा सोनार बांगला हे शब्द देखील नीट उच्चारता येत नाहीत. ते बंगालमध्ये होज पाइपमधून पाणी वाहते तसा पैसा वाहावत आहेत. पण एवढे करूनही ते बंगाल जिंकू शकत नाहीत. मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि दोन्ही पायांनी दिल्ली जिंकून दाखवेन अशा डरकाळी ममता बॅनर्जी यांनी फोडली आहे.