माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात CBI’ने गुन्हा नोंद केला आहे. तसेच CBI’ने त्यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरी आणि कार्यालयावर सुद्धा छापे मारले आहेत. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आता यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कारवाईवर भाष्य केले आहे.
म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केलं. याबाबतीत एकूण 4 जणांची चौकशी झाली, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली होती. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’चे आदेश दिलेले असताना गुन्हा कसाकाय नोंद झाला असे जयंत पाटील यांनी सांगितले.
ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झालं, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचं अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे अशी टीका त्यांनी केली आहे.