प्रतिनिधी!केज!
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यासह सह अनेक तालुक्यांत अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असताना वीज बिलापोटी सरसकट वीजपुरवठा बंद करून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. एकीकडे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांचा कळवळा दाखवायचा तर दुसरीकडे सक्तीची वीज वसुली सुरू करून या हाताने दिलेले त्या हाताने व्याजासकट वसूल करण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या वीज तोडणी अभियान त्वरित थांबवावी अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरें यांनी दिला आहे.
खरीप हंगाम वाया गेल्यामुळे हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगामात वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचे काम महावितरण करत असून शेतकर्यांच्या संयमाचा आता अंत झाला आहे. त्यांच्या आक्रोशाचा विस्फोट होण्याअगोदर सक्तीची वीज बिल वसुली बंद करून शेतकऱ्यांचा कृषी पंपांचा तोडलेला वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे आदेश तत्परतेने व्हावेत,अन्यथा महावितरणच्या विरोधात छावा मराठा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शिवाजी दादा ठोंबरें प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.