धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय
आशा कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे घेण्याचा निर्णय
मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यातील ७२ हजार आशा व गटप्रवर्तक त्यांच्या मागण्यासाठी १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर होते. हा संप मिटविण्यासाठी विविध सत्ताधारी नेत्यांनी त्याबाबत पुढाकार घेतला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या सोडविल्याने ऐन दिवाळीतील हा संप मागे घेण्यात आला आहे
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने वेळोवेळी चर्चा झाली. बुधवारी याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यासंदर्भात उपोषण, निदर्शने, जेलभरो आंदोलन सुरू होते. आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आरोग्य मंत्री सावंत तसेच अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसेकर यांच्याकडे चर्चा होऊन प्रमुख मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने आज झालेल्या बैठकीत घेतला. दिवाळीपूर्वी झालेल्या बैठकीत संप मागे घेण्यात आला.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील आशा कृती समिती वतीने १८ ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या या संपात ७२ हजार आशा व सुमारे साडेतीन हजार गटप्रवर्तक संपावर गेल्या होत्या .
संप काळात आरोग्यमंत्री सावंत यांनी आशा कर्मचाऱ्यांना सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये वेतनवाढ केली. आशा व गटप्रवर्तकांना दोन हजार रुपये दिवाळी भेटदेखील देण्याचे जाहीर केले. गटप्रवर्तकांना आशा कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी वेतनवाढ केल्याने आणि कंत्राटी दर्जाबाबत कोणचताही निर्णय न केल्याने असंतोष होता. आता संप मागे घेण्यात आला आहे.