अपघातात बळी गेलेल्यांच्या मित्रपरिवार व कुटुंबियांनी स्वखर्चाने धोकादायक खड्डे बुजवावेत हि शासन आणि प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब; मुख्यमंत्र्यांना निवेदन- डॉ.गणेश ढवळे
—-
बीड:- बीड शहरातुन जाणा-या धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बार्शी रोडवरील धोकादायक खड्डा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि नगरपरीषद प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अपघातात बळी गेलेल्या स्व. महेश राजेंद्र पाचंग्रे यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वखर्चाने आज दि.२० एप्रिल शनिवार रोजी बुजवला.हि बाब शासन, जिल्हा प्रशासन यांच्या साठी अत्यंत लाजिरवाणी आणि बीडकरांसाठी संतापजनक घटना असुन याविषयी तिव्र नाराजी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री, प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सचिव, पालकमंत्री बीड यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत निवेदनाद्वारे कळवली आहे.
बार्शी रोडवरील धोकादायक खड्यात पडुन अनेकांना अपंगत्व आलेले आहे.त्यातच दि.२८ सप्टेंबर रोजी या खड्ड्यात महेश राजेंद्र पाचंग्रे या घरातील कर्ता पुरुषाचा अपघात झाला होता.उपचार सुरू असतानाच दि.६ आक्टोबर रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तरीही प्रशासनाला जाग आली नाही.सामाजिक कार्यकर्ते यांनी तात्पुरत्या स्वरूपात खड्डा बुजवून घेतला होता. नुकत्याच आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा खड्डा उघडा पडला असुन आठवडाभरात ३ जणांचा अपघात झाला असुन सुदैवाने जिवितहानी झाली नाही.वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाला जाग न आल्याने अखेर आज दि.२० एप्रिल शनिवार रोजी स्व.महेश राजेंद्र पाचंग्रे यांचे कुटुंबीय आणि पापनेश्वर मित्रमंडळ यांनी सिमेंट क्रांक्रिट सहाय्याने स्वखर्चाने खड्डा बुजवला असुन एकंदरीतच लोकप्रतिनिधी शासन, महामार्ग प्राधिकरण, नगर परिषद प्रशासन यांच्या संवेदनहिनता आणि निष्क्रियतेबद्दल बीडकरांमध्ये तिव्र संतापाची भावना आहे.