बीड / गेवराई
आम्ही शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुरोगामी विचाराचे पाईक असलेले कार्यकर्ते आहोत याऊलट भाजपच्या उमेदवार व त्यांचे नेते जातीयवाद निर्माण करण्यातच धन्यता मानत आहेत. ते जातीपातीच्या राजकारणाचा आधार घेत आहेत असा आरोप बजरंग बप्पा सोनवणे यांनी केला. तसेच आम्हाला जाती-जातीत तेढ निर्माण करण्याची नाही. तर आम्हाला सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी गुण्या गोविंदाने राहण्यासाठी सर्वधर्म समभाव व प्रत्येकाला संविधानाने दिलेल्या अधिकाराने न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी काम करायचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले
बीड लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथे मतदारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री लोकनेते बदामराव पंडित, युवा नेते युध्दजीत पंडित, पूजाताई मोरे धम्मपाल कांडेकर, श्रीनिवास बेदरे, दत्ता कांबळे, कैलास राठोड, अण्णासाहेब राठोड, पंढरीनाथ लगड, अमोल सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बजरंग सोनवणे म्हणाले की, आमचे नेते शरदचंद्र पवार हे या देशाचे नेते असून ते पूरोगामी विचारायचे आहेत. त्याच विचाराचे आम्ही पाईक आहोत. जातीयवाद पसरवून व जातीजातीत तेढ निर्माण करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. या उलट भाजप जातीवादाचा आधार घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. त्यातून मतदान मिळण्यासाठी कुटील डाव रचित आहे. परंतु या जिल्ह्यातील जनता त्यांचा हा डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.