काँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदी
अहमदनगर-काँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले, ४ जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असून त्यानंतर या आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी मिळणार नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नगरमधील महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.यावेळी बोलताना त्यांनी केंद्रात माझे हाथ बळकट करण्यासाठी महायुती चे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थित जन समुदयाला केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,नामदार दादासाहेब भुसे, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिकाताई राजळे, माजी मंत्री जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, शालिनीताई विखे, अनुराधाताई नागवडे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींची इंडिया आघाडीवर टीका !
आज देशात तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी भाजपला समर्थन मिळत आहे. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे ४ जून रोजी इंडिया आघाडीची ‘एक्सपायरी डेट’ निश्चित केली आहे. त्यानंतर इंडिया आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी सापडणार नाही. निवडणुकीपूर्वी जो भानूमतीचा कुणबा जोडला गेला, तो ४ जून नंतर
दिसणार नाही अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीवर केली आहे. यंदाची निवडणूक ही संतुष्टीकरण विरुद्ध तुष्टीकरण अशी आहे. भाजपाकडून देशावासियांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तर इंडिया आघडीच्या नेत्यांकडून तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असेही यावेळी मोदी म्हणाले.