पंढरपूर : महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडवण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत असल्याने उद्धव सरकारच्या काळातच अधिक बदनामी झाली. 100 कोटी प्रकरणात गृहमंत्र्यांप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी देखील आपला राजीनामा दिला पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवेढा येथे बोलताना व्यक्त केले. पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारा निमित्ताने रामदास आठवले मंगळवेढा दौऱ्यावर आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
सध्या पोलिस अधिकारी आपल्या जीवाची बाजी लावत कोरोनाशी लढताना अठरा-अठरा तास सेवा करीत आहेत. पण ज्या गोष्टी आतंकवादी करतो त्या गोष्टी काही पोलिस अधिकाऱ्यांनी केल्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होऊ लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे तोंड काळे झाले आहे. शिवराय व भीमरायाच्या राज्यामध्ये महाराष्ट्राची अधिक बदनामी झाल्याने, जर सत्ता चालवता येत नसेल तर सत्ता सोडा. सध्या एका बाजूला कोरोनाचा सामना करायचा आहे तर दुसऱ्या बाजूला आपणाला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा देखील सामना करायचा आहे. अस देखील रामदास आठवले म्हणाले आहेत.
समाजामध्ये समता प्रस्थापित होण्यासाठी व ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. महिलांवरील अन्याय- अत्याचार थांबले पाहिजेत या मागण्या करणारा आरपीआय पक्ष आहे, असेही रामदास आठवले या वेळी म्हणाले.