धनंजय मुंडेंनी काय देऊन प्रकरण सेटलं केलं हे त्यांनाच ठाऊक-निलेश राणे.
🔸अशोक काळकुटे | संपादक
धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार आरोपाचं प्रकरण काहीतरी देऊन सेटल केलं. त्यांनी यासाठी काय दिलं हे त्यांनाच ठाऊक, असे वक्तव्य भाजप नेते निलेश राणे यांनी केले. मंत्री गुन्हा करतात आणि स्वत:लाच क्लीन चीट देतात. ठाकरे सरकारच्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत. त्यांनी मनोहर जोशी यांच्यासारख्या माणसाला मुख्यमंत्रीपदावरून काढले. पण उद्धव ठाकरे यांच्यात तशी धमक नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
निलेश राणे यांनी गुरुवारी मुंबईत ‘मिडीयाच्या’एका चॅनलशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे सरकारला लक्ष्य केले. सरकार आणि पोलीस संजय राठोड यांना वाचवण्याचं काम करत आहेत. फोटो, ऑडिओ क्लीप आणि व्हीडिओ या गोष्टी आभाळातून बाहेर पडल्या आहेत का, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला. तसेच पूजा चव्हाणला न्याय मिळाला नाही तर आम्ही चौकाचौकात आंदोलनं करु, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला.
…म्हणून सुशांत आत्महत्याप्रकरणाचा गुंता सुटला नाही-निलेश राणे.
पोलिसांकडून सुशांत राजपूतप्रमाणे पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणही दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सुशांत राजपूत प्रकरणाचा तपास ७० दिवसांनी पोलिसांकडे गेला. तोपर्यंत पुरावे नष्ट झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा होऊ शकला नाही, असा दावा निलेश राणे यांनी केला.
‘मी मर्द आहे‘ असं परत कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नका- निलेश राणे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कधीही आपल्या भाषणात ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख करु नये, अशी जळजळीत टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली.
ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत आहे.पूजा चव्हाण प्रकरणात सर्व बाजूंनी अडकलेले संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतात. कॅबिनेट मिटिंगला येऊन बसतात. तरीही त्यांचा राजीनामा घेण्याचं धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.