धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय
शरद पवार – पंकजा मुंडे यांच्या भेटीचा उद्देश झाला साध्य ; राज्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर निघाला तोडगा
पुणे (प्रतिनिधी) :- राज्यातील ऊसतोड कामगार मजुरीत 92 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर तोडगा निघाला. ऊसतोड कामगारांना सध्या 274 रुपये प्रति टन मजुरी दिली जाते. त्यात 34 टक्के दरवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना चालू हंगामापासून 366 रुपये प्रति टन मजुरी मिळणार आहे.
राज्यातील ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऊसतोड कामगारांना मजुरीमध्ये 92 रुपयांची वाढ झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीमुळे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे.
पुण्यातील साखर संकुल मध्ये साखर कामगार आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. अपेक्षित दरवाढ न दिल्यास कोयताबंद आंदोलनाचा इशारा ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी दिला होता. राज्य साखर महासंघाचे पी आर पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर महासंघाचे संचालक जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आदी बैठकीसाठी उपस्थित होते.
ऊसतोड कामगारांना सध्या 274 रुपये प्रति टन मजुरी दिली जाते. त्यात 34% दरवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना चालू हंगामापासून 366 रुपये प्रति टन इतकी मजुरी मिळणार आहे. दरम्यान मुकादम यांच्या कमिशनमध्ये देखील एक टक्क्याची वाढ करण्यात आली असून त्यांना मजुरीच्या 20 टक्के कमिशन देण्यात येणार आहे.
राज्यातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच काम अपेक्षित गतीने पुढे जात नाहीये. त्याबद्दल आपण असमाधानी असल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलय. या संदर्भात आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असं देखील पंकजा मुंडे पुण्यात म्हणाल्या.
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहिल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.