सोलापूर संपादक – महेश पवार
प्रतिनिधी- संतोष विभुते
मराठायोध्दाश्री तथा मराठावीर मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली,मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निघालेल्या आंतरवाली सराटी ते मुंबई या पायी पदयात्रेच्या निघालेल्या मोर्च्यात श्रीक्षेत्र मार्डी येथील मराठा समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील तीन मावळे सहभागी झाले होते.त्यांचे रविवारी सायंकाळी सात च्या दरम्यान गावात आगमन झाले.त्यावेळी गावातील शिवतीर्थ मैदानावर त्यांचे जंगी स्वागत डॉल्बी व डिजे च्या आवाजात,आरगजा व गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करुन फटाक्यांची आतिषबाजी करीत,जंगी स्वागत करुन,ग्रामस्थांनी जल्लोष केेल.
यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मनोज जरांगे-पाटील,तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ हैं’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं,नाही कुणाच्या बापाचं’अशा गगनभेदी जय घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता.
प्रारंभी मुंबईहून आलेल्या तीन्ही मावळ्यांचे औक्षण करून,शिवतीर्थावर त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या जनसमुदाया सोबत पदयात्रा द्वारे वाजतगाजत जावून, मुख्यवेसीतील दक्षिणमुखी श्री मारुती चे दर्शन घेवून,ग्रामपंचायत कार्यालयावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून,त्या तिघांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
त्यानंतर शिवतीर्थ मैदानावर सकल मराठा समाजाच्या वतीने,त्या तीन मावळ्यांचा सोमनाथ लहू माने,ज्योतिराम मनोहर निकम,गोपाळ दत्तात्रय सुरवसे यांना मानाचा फेटा व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.
तिघांचीही कौटुंबिक परिस्थिती अतिशय नाजूक असताना,मराठा समाजाच्या आंदोलनात स्वंयपूर्तीने मुंबईला जावून आरक्षणाच्या लढ्यात सहभागी झाल्याबद्दल,पंचक्रोशीतील सर्व समाजाचे बांधव त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.
पायी पदयात्रा मिरवणुकीची सुरुवात शिवतीर्थ मैदानावरुनच झाली होती व शेवट ही त्याच ठिकाणी दोन तासांनंतर पायी पदयात्रा मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
सर्व समाजातील उपस्थितांचे सकल मराठा समाजाच्या वतीने आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी सर्व समाजातील नागरिक या जल्लोषाच्या मिरवणुकीमध्ये,बहुसंख्येने सामिल झाले होते.