सोलापूर संपादक – महेश पवार
प्रतिनिधी – संतोष विभुते
उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्डी येथे श्रीराम रथयात्रेचे प्रणेते तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांना “भारतरत्न” या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिल्या प्रित्यार्थ मार्डी येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून उपस्थित कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करीत,गावात आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील कारसेवक विष्णू जगताप, जगन्नाथ पवार,शत्रुघ्न गोडसे,बिरु गोरे,सोमनाथ पांढरे, सहदेव शिंदे आदी प्रमुख कार्यकर्त्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार म्हणाले की,सन १९८९ ते १९९२ मध्ये तीर्थक्षेत्र अयोध्येमधील श्रीराम जन्मभूमी च्या ठिकाणीचं श्रीप्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व भव्यदिव्य निर्माणधीन मंदिर व्हावे,
यासाठी देशातील कानाकोपऱ्यात आपल्या रथयात्रेच्या माध्यमातून प्रवास करत भारतीय जनता पक्षालाही राष्ट्रीय स्तरावर नवीन ओळख करून दिली.तसेच त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते देशपातळीवरील संविधानातील उपपंतप्रधान पदापर्यंतची आपल्या खडतर प्रवासातून अतुलनीय कामगिरी निष्ठेने बजावून देशाची प्रामाणिकपणे सेवा केली.त्यांच्याच विचारांची शिदोरी घेवूनच,आम्हीही जिल्ह्यात पक्षाची बांधणी करण्यासाठी सतत प्रवास करत होतो,असेही शिवाजी सोनार यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांना “भारतरत्न” या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देत असतानाची चित्रफीत चित्रवाहिनीवर पहाताना, अतिशय आनंद झाल्याचे,त्यांनी याप्रसंगी सांगितले.