राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काँग्रेसवर आरोप लागवल्यानंतर आता अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप लगावला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेसची सत्ता असताना दिवंगत माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी मांडला. मंत्रालयावर १९८२ साली मोर्चा काढला होता.
मात्र, त्यानंतर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली. अण्णासाहेब पाटलांनी म्हणजेच माझ्या वडिलांनी काँग्रेसने कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून आत्महत्या केली, असा गंभीर आरोप कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे. ते बीड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आता त्यांच्या या आरोपामुळे राज्यतील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.
माझे वडील काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार होते. त्यांनी आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर काहीच निर्णय घेतला गेला नाही. मराठा आरक्षणासाठी १९८२ साली काँग्रेसने कोणतीच समिती स्थापन केली नाही आणि म्हणून वडिलांनी आत्महत्या केली, असा गंभीर आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला.