रत्नागिरी | रत्नागिरीत ” गाव तेथे शाखा ” अभियानाला सुरवात झाली असून याच पार्श्वभूमीवर राजापूर अणसुरे मनसे शाखेचे उदघाटन पक्षाचे उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री सतीश रत्नाकर नारकर यांच्या हस्ते करण्यात आले. आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी हा सदर कार्यक्रम पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती याच दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर वाटचाल करणाऱ्या मनसे पक्षाच्या राजापूर अणसुरे शाखेच्या उदघाटन प्रसंगी लालफीत (रिबीन) कापून सतीश नारकर यांनी शाखेत प्रवेश केला.
या शाखेच्या उदघाटनप्रसंगी सतीश नारकर यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच गावागावात, तालुक्यांमध्ये आणि खेड्यांमध्ये मनसे पक्षाच्या प्रचार करण्यासाठी सर्वांनी कशाप्रकारे काम केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्याने सामान्य नागरिक यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती. त्याचसोबत या कार्यक्रमाला श्री अविनाश सौंदळकर (द.रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष) तसेच श्री अमोल साळुंखे (महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना, अध्यक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग) हे सुद्धा उपस्थित होते. तसेच अनेक पदाधिकारी वर्गाने हजेरी लावली होती.
तसेच या कार्यक्रमाला शाखा अध्यक्ष संकेत वाडेकर, विभाग अध्यक्ष राकेश कणेरी, उप-तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर, तालुका संपर्क अध्यक्ष दत्ता दिवाळे, तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव, महिला तालुका अध्यक्ष शर्वरी लिंगायत, तालुका सचिव संजय जड्याल, सह-संपर्क अध्यक्ष महादेव नवलू आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
येणाऱ्या दिवसात कोकणात मोठ्या संख्याने मनसे शाखांच्या उदघाटनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचे वृत्त समोर आले. मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन कोकणातील तरुण वर्ग आज मनसेमध्ये सामील होण्यासाठी पुढे येत आहे याची प्रचिती ग्रामपंचायती निवडणुकीच्या निकालावरून दिसून आली होती. प्रत्येक गावा-गावात मनसे पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी गावांमध्ये शाखा उघडणार असल्याचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावेळी बोलून दाखविले होते. याच पार्श्वभूमीवर आता राजापूर अणसुरे येथे मनसे शाखेचा उदघाटन सोहळा पार पडला.