धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय
आज राज्यातील तब्बल ८८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ६ हजार रुपये होणार जमा
दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज राज्यातील तब्बल ८८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ६ हजार रुपये जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील कार्यक्रमातून ही बुधवारी (२८ फेब्रुवारी) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.
यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्याचे २ हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे ४ हजार, असे एकूण ६ हजार रुपयांचा समावेश आहे. राज्यातील ८७.९६ लाख शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत.
तसे पाहता खरीप, रब्बी हंगामात पेरणी, मशागत, खते आणि शेतमजुरांना मजुरी देण्यासाठी ही रक्कम यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती. मात्र, सरकारी कामांच्या विलंबामुळे या योजनेचा निधी ऐन उन्हाळ्यात मिळत आहेत. राज्य सरकारकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्रातील मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करते. प्रत्येकी २ हजार रुपये हप्त्यांच्या स्वरुपात ही मदत दिली जाते. आता त्यात राज्य सरकारने सुरू केलेल्या शेतकरी महासन्मान योजनेची देखील अंमलबजावणी करण्यात येत आहे.
राज्यातील ८५.६० लाख शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी १७१२ कोटी रुपये इतकी रक्कम यापूर्वी देण्यात आली आहे. २०२३-२४ मधील उर्वरीत दुसरा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या आज, बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. प्रत्येकी ६ हजार रुपये मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.