पैठण – रामपुरी बस तलवाडा बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांचे हाल…
वयोवृद्ध,लहान मुले,महिलांची होते गैरसोय…
गेवराई प्रतिनिधी;-पैठण डेपो मधून तलवाडा मार्गे रामपुरी या ठिकाणी सुरू असलेली बस ही तलवाडा चौकातच प्रवाशी सोडत असून तलवाडा गावातील बसस्थानकात जात नसल्यामुळे तलवाडा येथे उतरणारे वयोवृद्ध,महिला तसेच लहान प्रवाशी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे,महिलांना रात्रीच्या वेळी गावात जातांना त्रास सहन करावा लागत असल्याने बस ने गावातील बसस्थानकावर स्टॉप घ्यावा अशी मागणी प्रवाशा कडून होत आहे.
या बाबत सविस्तर असे की ,पैठण येथून गेवराई तालुक्यातील रामपुरी बस ही तलवाडा मार्गे सुरू आहे यामुळे अनेक गावातील प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे परंतु सदरील बस ही तलवाडा येथे आल्या नंतर ती गाडीमध्ये असलेले प्रवाशी तलवाडा गाव पासून एक ते दीड किलोमीटर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभी करण्यात येते व तेथेच बसमधील प्रवाशांना उतरावे लागते त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते बस मध्ये वयोवृद्ध,महिला,लहान मुले प्रवास करतात त्यांना गावापासून दूर सोडल्यामुळे गावात जाण्यासाठी वाहनाची सोय नसते,काही आजाराने त्रस्त असतात तर लहान मुलांना घेवून दूर गावात पायी जावे लागते,याप्रकरणी दिनांक २५ एप्रिल रोजी तलवाडा गावातील समाजसेवक व पत्रकार बांधवांनी बस चे चालक आणि वाहक यांच्याशी संवाद साधून बस गावातील बसस्थानकात न्यावी अशी मागणी केली परंतु आम्हाला तशी परमिशन नाही असे त्यांच्याकडून उत्तर आले.याबाबत परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देवून बस तलवाडा गावातील बसस्थानकात पाठवून प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी होत आहे.