मानवतेला काळीमा फासणा-या घटनेंचा तीव्र निषेध!
मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघातर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन
दिनांक २२-०६-२०२३
मुरुड जंजिरा ( जाहीद फकजी )
महाराष्ट्राला हादरून टाकणा-या व मानवतेला कालिमा फासणाऱ्या दोन घटना नुकत्याच राज्यात घडलेल्या आहेत.या दोन्ही घटनांचा मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ समस्त बहुजनांच्या वतीने जाहीर निषेध करीत तहसीलदार रोहन शिंदे व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन देण्यात आले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, नांदेड जिल्ह्यातील बॉढार गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून त्या गावातील जातीयवादी लोकांनी मनात द्वेष धरून अक्षय भालेराव या भिमसैनिकाची निर्घुण हत्या करण्यात आली. अक्षय भालेराव यांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व या घटनेचा आम्ही तमाम बहुजन जाहीर निषेध करीत आहोत.
दुसरी घटना मुंबई चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह येथे अकोला येथून कॉम्प्युटर इंजिनियरींग मध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हीना मेश्राम या बौद्ध तरुणीवर तेथील गेटवर असलेल्या सुरक्षारक्षक या नराधमाने ती तिच्या खोलीत एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या केली. सदर घटना महाराष्ट्राला हादरून टाकणा-या व मानवतेला कालिमा फासणा-या आहेत.यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकी सुरक्षित नसल्याचा हा पुरावा आहे. सदर घटनेचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत आहोत.
सदर दोन्ही घटना महाराष्ट्राला बदनाम करणा-या आहेत व फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना हानिकारक आहेत. दोन्ही घटनांचा महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने विचार करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जातीयवादी अत्याचारी लोकांचा बंदोबस्त करावा तसेच पिडीत कुटुंबियांना तत्काळ रुपये ५० लाखांची आर्थिक मदत मिळावी,पिडीत कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे.या आमच्या मागण्या असून सदर दोन्ही प्रकरणामध्ये आमच्या निषेधाचा तीव्र प्रतिसाद शासना पर्यंत पोहोचवावा, कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होईल. अशी मागणी मुरुड तालुक्यातील बौद्ध समाज्यातील तमाम जनता करीत आहे.असे मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे अध्यक्ष, .वसंत मोरे उपसचिव . धर्मेश मोरे , स्थानिक तालुका कमिटीचे , विजय गोविंद मोरे, मनोहर तांबे, एन एम गायवाड , मंगेश बा.मोरे, जनार्दन शिंदे, प्रकाश जाधव,सदानंद मोरे,रघुनाथ पवार, सदानंद मोरे,राकेश कदम, अनंत तुळसकर, धर्मचंद्र सोरे, शिवदास मोरे, सुधारक कांबळे , नरेंद्र जाधव, गौतम मोरे,मोनीष् तांबे , गणेश तांबे, संजय तांबे, सुनिल गायकवाड, सरोज ओव्हाळ, सिद्धांत ओव्हाळ समाज बांधव उपस्थित होते.